Tuesday, May 12, 2026
Tuesday, March 17, 2026
लोकशाहीचा आधारस्तंभ व लोकशाही टिकवून ठेवणारे खरे योद्धे
देशहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, सरकारच्या चुकीच्या कार्यप्रणालीवर निर्भीडपणे जाब विचारणाऱ्या स्वाभिमानी लेखणीला आणि प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेला संपवण्याचे, तिची गळचेपी करून लोकशाहीच्या नावाखाली अदृश्य अशी भयानक हुकूमशाही सुरू ठेवण्याचे षडयंत्र सुरू झालेले आहे. जे कधीच सर्वसाधारण सामान्य जनतेला न्याय, हक्क व चांगली जीवनशैली प्रदान करू शकत नाही.
भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी पूरक खत म्हणून लाचार, विकल्या गेलेल्या लेखण्यांचा सुळसुळाट या सरकारच्या काळात विपुल प्रमाणात झालेला आहे. अशा पैशाने विकल्या गेलेल्या लोकांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्याऐवजी राज्यकर्त्यांचे अधिकृत चापलूस बनून राहणे योग्य ठरेल.
कारण पत्रकारिता हे फक्त पैसे कमावण्याचे साधन नसून तो एक क्रांतीचा आवाज आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याचा, दबल्या-पिचलेल्या गरीब जनतेच्या हक्कांचा एल्गार आहे, देशाची अखंडता, सार्वभौमत्व टिकवून जनतेच्या प्रत्येक पैशाचे नियोजन सरकारमधील जनतेचे सेवक असलेले राजकारणी आणि अधिकारी नीट प्रामाणिकपणे करत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवून ते चुकत असतील तर त्यांना जाब विचारून जनतेला त्याबद्दल जागृत करून देशहित जपणारे एक जबाबदारीचे पद आहे.
आणि हे सर्व ज्या जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या जनतेने नेत्यांची, राजकारण्यांची भक्ती करणे सोडून खऱ्या पत्रकारितेला बळ व खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटेल व चापलूसी करणाऱ्या बनावट स्वार्थी पत्रकार व साहित्यिकांना जरब बसेल आणि सत्यपरिस्थिती जनतेसमोर येईल.
अन्यथा स्वातंत्र्य मिळूनही स्वतःच्या देशातील माणसांच्या हातातच देशाचा कारभार व स्वतःचा कष्टाचा पैसा सोपवून अदृश्य पारतंत्र्यात जीवन जगण्यात धन्यता मानणारी जमात म्हणून आपली ख्याती चिरकाल पृथ्वीतलावर टिकून राहील.
के. सतीश
Saturday, February 25, 2023
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
साम दाम दंड भेदाचे सहाय्य घेऊनी
भ्रष्ट राजकारणी ते येतील मग निवडूनी,
म्हणून स्वाभिमान मनी सगळ्यांनी जागवा
सुंदर ह्या लोकशाहीस अतिसुंदर बनवा
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
✒ K. Satish
Tuesday, February 14, 2023
व्हॅलेन्टाइन
माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.
आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.
✒ K.Satish
Wednesday, September 29, 2021
श्रेष्ठ दान
जो मनुष्य सुदृढ आहे त्याने जसे जमेल तसे रक्तदान अवश्य करावेत.
कोरोनाच्या दुष्टचक्राने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप दिवसांनंतर टाटा मोटर्स, कार प्लान्ट, पुणे येथे आज २९ सप्टेंबर २०२१ रोजी रक्तदान करण्याचा योग आला. खूप समाधान वाटले.
Sunday, September 26, 2021
बदल घडत नाही, घडवावा लागतो...
आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.असाच अहंकार शाळा, काॅलेज निवडण्याच्या बाबतीत सुरू झालाय. माझा मुलगा, माझी मुलगी अमूक शाळेत, अमूक काॅलेजला आहे हे पालकवर्ग अतिशय अभिमानाने सांगताना दिसतात. मोठी मोठी नावे सांगताना, त्या संस्थेची ख्याती सांगताना पालकवर्ग थकत नाही. कारण हा त्यांनी घेतलेला निर्णय असतो. आणि आपण घेतलेला निर्णय इतरांसमोर वाईट किंवा चुकीचा ठरणे हा पालकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटते. म्हणून ही केविलवाणी धडपड.
परंतु या सर्व खटाटोपात पालक हेच विसरून चाललेत की, काही बोटावर मोजण्याइतक्या शिक्षणसंस्था सोडल्या तर सर्व शिक्षणसंस्थांचे कामकाज हे शेअर मार्केटमधील दुय्यम दर्जाच्या बनावट कंपन्यांसारखे झाले आहे. आपल्या शाळेचा भाव वाढवण्यासाठी खोटे चित्र निर्माण करून मोठमोठ्या बढाया मारणे, पालकांना मोठी स्वप्न दाखवणे, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशाचेतरी आमिष देऊन त्याच्याद्वारेही शाळेची बनावट प्रसिद्धी करणे, विविध ॲक्टीव्हीटीजचे प्रेझेंटेशन करून आम्ही किती प्रमाणात मुलांना घडवण्यासाठी कार्यरत असणार आहोत हे दाखवले जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात यातील १० ते २० टक्केच चित्र खरे असते बाकी सर्व दिखावा. तुम्ही त्यांच्यासाठी फक्त पैसे छापण्याचे एक साधन असता. आणि या भ्रमातून जागे होईपर्यंत तुमचा आणि तुमच्या पाल्याचा आयुष्यातील कधीही परत मिळू न शकणारा बहुमूल्य वेळ वाया गेलेला असतो.
नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् ,
नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता ।
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ।।
खूप कष्ट करून गेलेली संपत्ती मिळवता येते.
विसरल्यामुळे गेलेली विद्या अभ्यास करून पुन्हा मिळवता येते. बिघडलेली तब्येत चांगले उपचार करून ती सुधारता येते. पण वेळ वाया घालवला तर तो गेला तो गेलाच.
म्हणून वेळेचं नुकसान कधीही भरून काढता येत नसल्याने वेळीच भ्रमातून जागे होऊन आपली खोटी फुशारकी मारणे थांबवायला हवे.
आपला पाल्य ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतोय त्या संस्थेचे गुणगान नक्कीच गावे परंतु संस्थेने निर्माण केलेल्या भ्रमाला पाहून, त्यांच्या दिखाव्याला भाळून नाही तर त्यांचे कामकाज प्रामाणिकपणे मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होते आहे का ?, फक्त पैशाच्या बाजारात गुरफटून संस्था आपल्या नीतिमूल्यांना आणि मुलांचे भवितव्य घडवण्यासारख्या महान कार्याच्या मूळ उद्दिष्टाला मूठमाती तर देत नाहीये ना ? या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून.
आज एखाद्या निवासी सैनिकी शाळेत मुलांना दाखल केल्यानंतर पालक निर्धास्त राहून आता आपल्या पाल्याचा अगदी उत्तमप्रकारे सर्वांगीण विकास होणार या भ्रमात जगत राहतात. अनेकांना तर आपले काम पैसे भरणे एवढेच राहिले आहे असे वाटू लागते. बहुतांशी निवासी शाळा या त्यांच्या भरमसाठ फी स्ट्रक्चरच्या अनुषंगाने पालकांची आर्थिक कुवत पाहूनच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करतात. परंतु, फक्त फी भरून आपल्याच विश्वात रममाण होण्याचे व शालेय संस्थांच्या खोट्या आश्वासनांना भुलून स्वतःचे मानसिक समाधान करून घेण्याचे धोरण पालकांनी अवलंबिल्यास ते त्यांच्याबरोबरच त्यांच्या पाल्याच्या, इतर विद्यार्थ्यांच्या व इतर पालकांच्याही नुकसानास कारणीभूत ठरू शकतात.
वेळीच पालकांनी भ्रमातून जागे होऊन शालेय संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी, मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी, निवासी सैनिकी शाळा असल्यास त्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाविषयी शालेय व्यवस्थापनाने वरवर दाखवलेल्या सुंदर चित्राला न भुलता वेळोवेळी गांभीर्याने पाठपुरावा करून शाळा व्यवस्थापनाचे काही चुकत असेल तर वेळीच निदर्शनास आणायला हवे. व त्यावर योग्य निर्णय वेळीच घ्यायला हवा.
कोणतीही संस्था असो वा व्यक्ती तो आपली जमेची बाजूच समोर मांडत असतो, आपल्या कार्याचे कौतुकच सांगत असतो. आपल्या चुकीचे प्रदर्शन मांडत नाही. कारण हा सर्व आता पैशाचा खेळ होऊन बसलाय.
आज आपण पैसे भरूनही मुलांच्या अधोगतीस हातभार लावतोय अशीच अनेक पालकांची अवस्था झालीय. पालकांचा हा भ्रम वेळीच तुटला नाही तर हळूहळू वेळ पुढे निघून जाते व आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पालकांना पर्यायच उरत नाही. पण या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया जाऊन कधीही न भरणारे नुकसान होऊन जाते.
हे सर्व सुधारावयाचे असेल तर प्रत्येक पालकाने शालेय प्रशासनाकडून मांडल्या जाणाऱ्या भ्रमित व दिशाभूल करणार्या चित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवणे थांबवायला हवे. आणि शालेय प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा वेळोवेळी एक सुजाण पालक ( फक्त पैसे भरणारी मशीन नव्हे ) म्हणून पाठपुरावा करून शाळेने दिलेल्या आश्वासनांची खरंच पूर्तता होत आहे ना याची योग्यप्रकारे खातरजमा करायला हवी.
लक्षात ठेवा, कोणतीही संस्था अगदी योग्यपद्धतीनेच काम करत असेल असे समजणे साफ चुकीचे आहे. आणि त्यांना वेळीच चुकीच्या कार्यपद्धतीविषयी जाब विचारला नाही तर त्यांचेही चुकीचे कामकाज करण्याचे धाडस वाढत जाऊन हळूहळू तिथे कर्तव्य विसरून पैसे छापण्याचा घाणेरडा खेळ सुरू होतो. आणि मग या खेळातून निर्माण झालेला भ्रष्टाचाररूपी राक्षस पालकांचे पैसे व विद्यार्थ्यांमधील विविध गुणांसोबतच त्यांच्या भवितव्यालाही गिळंकृत करून टाकतो.
म्हणून सर्वांनी वेळीच जागे व्हा व आपल्या योग्य हक्कांसाठी प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासा. मग समोर शालेय संस्था असली तरी डगमगू नये. कारण चुकीची कृती ही आपल्या प्रिय व्यक्तीकडूनही होऊ शकते. म्हणून काय आपण त्याला जाब न विचारता चुका करण्यासाठी प्रोत्साहन देतो का ?
बलात्कार करणे, लूटमार करून खून करणे हे अक्षम्य गुन्हे आहेत. अशा गुन्हेगारांना शासन करण्यासाठी लढणे ही खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. परंतु हाच अपराध आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्यास त्याला जाब न विचारता त्याच्या या कृतीचे समर्थन करून त्याला पाठीशी घालणे ही अतिशय चुकीची भूमिका असे मी मानतो.
मग शाळेसारख्या वंदनीय संस्थेकडून चुकीची कार्यपद्धती अवलंबली जात असेल तर पालकांनी त्या चुका सुधारण्याची मागणी करायला का घाबरावे. बदल एका दिवसात घडत नाही हे मान्य. परंतु योग्य - अयोग्याची जाण ठेवून स्वतःच्या हक्कांसाठी प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर बदल कधीच घडणार नाही...
बघा विचार करून.......🙏🏻
Friday, July 23, 2021
शतशः नमन
✒ K. Satish
Saturday, June 26, 2021
सामर्थ्य युवा पिढीचे
नमस्कार,
आजकाल शिक्षणाची स्पर्धा इतकी वाढली आहे, की सध्याची पिढी ही अभ्यास एके अभ्यास व मार्कांची शर्यत यांच्यातच गुरफटून गेली आहे. आणि अतिमहत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन पालकच नकळत मुलांना या शर्यतीत ढकलत असतात.
आणि मग बहुतांशी मुलांना सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाची जपणूक करायचे फक्त धडेच दिले जातात. परंतु प्राधान्याने या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पाडून त्यांच्या कृतीत उतरवायला पालक कमी पडतात.
भविष्यात ही गोष्ट मानवी जीवनासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. कारण युवा पिढीमधील धडाडी आणि कोणतेही काम तडीस न्यावयाचा जोश इतर सर्व पिढ्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे युवा पिढीस योग्य मार्गदर्शन करून योग्य समाजोपयोगी कृती त्यांच्याकडून घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे.
श्रीयश आणि त्याचा मित्रपरिवार यांचे हे दहावीचे वर्ष, आणि तेही ICSE बोर्डाचे. तरीही तो व त्याचा मित्रपरिवार नित्याने दररोज पुण्यातील विविध भागात सायकलिंग करीत असतात. कधी सिंहगड, तर कधी हनुमान टेकडी, कधी पर्वती तर कधी बाणेर हिल्स.
अशाच गप्पा मारता मारता पावसाळा नजीक आल्यामुळे टेकडीवर वृक्षारोपण करण्याच्या विषयावर शिक्कामोर्तब झाले. मग या सर्व मित्रमंडळींनी पुण्यात सायकलवर जाऊन विविध प्रकारची अकरा रोपे वृक्षारोपणासाठी आणली. ( ताम्हण, करंज, टेंभुर्णी, धावडा, कांचन, करमळ, रोहितक, मुचकुंद, जांभुळ, चिंच ).
रोपे आणायला गेलेले हे चौघेच...श्रीयश, अनुज, प्रतिक आणि रोहित. आणि वृक्षारोपण करतेवेळी देखील रोहितला वैयक्तिक कारणास्तव जाणे शक्य न झाल्यामुळे वृक्षारोपण करायची जबाबदारी उरलेल्या तिघांवर येऊन ठेपली. तरीही नियोजित वेळापत्रकानुसार आज श्रीयश, अनुज व प्रतीक यांनी वृक्षारोपणाची जबाबदारी पार पाडली. इतरही पर्यावरणप्रेमी तिथे वृक्षारोपण करून जात असताना त्यांची या तिघांशी गाठ पडली व त्यांनीही यांचे कौतुक करून यांना प्रोत्साहन देऊन यांचा उत्साह वाढवला.
सध्या आपला अभ्यास सांभाळून अशा स्तुत्य समाजोपयोगी कामांमध्ये योगदान देण्याचे महत्वपूर्ण पाऊल या चौघांनी टाकले असले तरी भविष्यात त्यांचा इतर मित्रपरिवारदेखील अशा कामांमध्ये त्यांना जोडला जाईल. अर्थातच त्यात सर्वात मोठी जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी सतत शालेय अभ्यासाचा रेटा मुलांच्या मागे न लावता मुलांना इतर समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमांमध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रेरित करायला हवे.
निसर्गाची आणि देशाची विस्कळीत झालेली घडी सुरळीत करण्याचे सामर्थ्य जर कोणात असेल तर ती म्हणजे आपली युवा पिढी.
चला तर मग या युवा पिढीला योग्य मार्ग दाखवून त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि नव्या उमेदीचा उपयोग करून आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदी बनवूया...
धन्यवाद.....!!! 🙏🏻
✒ K. Satish
Tuesday, June 22, 2021
कर्तव्याची जाणीव ठेवा
आज एक संवेदनशील, सामाजिक पण दुर्दैवी विषय आपणा सर्वांसमोर मांडत आहे.
आज कायद्याचे संरक्षण असल्याने सामान्य जनता सुखाने श्वास घेऊन जगण्याचे वेडे स्वप्न बाळगून आहे. खरेतर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत बर्याच लोकांना कळतंच नाही की, हा सामान्य जनतेसाठी असलेला कायदा व कायद्याने जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पोलिस बांधव यांना धनदांडग्यांनी पैसा, सत्ता आणि ताकदीच्या जोरावर सामान्य जनतेच्या विरूद्ध त्यांची पिळवणूक करणारे हत्यार बनवले आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजातील विविध समस्या हाताळताना ज्या ज्या वेळी पोलीस खात्यातील लोकांशी संबंध आला त्या त्या वेळी पोलिसांची भूमिका ही फसवणूक अथवा छळवणूक करणार्या पैसेवाल्यांच्या बाजूनेच दिसली व सामान्य परंतु पैशाची लाच देऊ न शकणार्या अथवा लाच देण्याच्या विरूद्ध असणाऱ्या सरळमार्गी माणसांना पोलिस दमदाटी करताना दिसले. अनेकदा तर आत टाकण्याची भिती दाखवून त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जाते. आयुष्यात फक्त दोनदाच प्रामाणिकपणाने पोलिसांनी सामान्य व्यक्तीस सहकार्य करतानाचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ते ही खात्यातील लोकांपासून दूर राहून.
माझेही अनेक मित्र पोलिस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. पण पोलिस खात्याचे जे सामान्य लोकांसाठी असलेले संरक्षक कवच आहे ते इतके पोखरलेले आहे की, आज एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य नीट बजावले नाही तर त्याची तक्रार घेऊन वरिष्ठांकडे गेल्यास तिथे त्याहूनही जबर धक्का बसण्याची शक्यता असते कारण ही वाळवी वरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माझ्या मित्रमंडळींनादेखील या समस्यांसाठी मदत मागायचे धाडस होत नाही. कारण तेदेखील याच सिस्टीमचा एक भाग आहेत.
आज मीदेखील एकेकाळी सैन्यभरतीसाठी पात्र ठरलेला युवक होतो. शेवटच्या क्षणी काही घरगुती कारणांस्तव मला तो निर्णय बदलून औद्योगिक क्षेत्रात यावे लागले. कालांतराने मला ओळखणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी मला MPSC करून पोलिस खाते जाॅईन करण्याचा सल्ला दिला. तुमच्या सारख्या लोकांची पोलिस खात्याला गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. परंतु माझे ग्रॅज्युएशन पूर्ण नसून वयदेखील पुढे निघून गेल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
देशाच्या विकासासाठी, सामान्य लोकांच्या हक्कांसाठी तळमळ असलेला मी, पोलिस खाते जाॅईन करू शकलो नाही हे माझे भाग्यच समजतो. कारण पोलिसांचा जो भयानक चेहरा दिवसेंदिवस समोर येतोय तो पाहता माझी या खात्यात खूप घुसमट झाली असती आणि प्रामाणिकपणे कर्तव्य न बजावता येण्याचा मानसिक ताण वाढून मी कदाचित संपून गेलो असतो.
आज पोलिस सामान्यांना धमकावून पैसेवाल्यांचे आदेश मानत असतील, तर त्यांनी एक विचार करावा की जर सीमेवर आमच्यासोबत तुमचेही रक्षण करणारे सैन्याचे जवान यांच्या हातात आपल्या स्वातंत्र्याची व जिवाची दोरी आहे. जर दुश्मन राष्ट्रांनी त्यांना सात पिढ्या बसून खातील इतका पैसा दिला आणि तुम्हा आम्हासारख्या सर्वांवरच अन्याय करायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ? जर तुम्ही त्यांच्याकडून देशभक्तीची आणि प्राण पणाला लावून देशातील सर्व जनतेचे संरक्षण करण्याची अपेक्षा बाळगता तर मग तुम्हाला वैयक्तिक स्वार्थ सोडून धनदांडग्यांपासून न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य जनतेच्या बाजूने थांबण्यास काय हरकत आहे. पैसेवाल्या मस्तवाल लोकांना योग्य न्यायिक निर्णय घेण्यास भाग पाडण्यात तुमचे योगदान असूद्यात की.
प्रत्येक पोलिस हा अंगावरची वर्दी काढून ठेवल्यावर आमच्यासारखा सामान्य माणूसच असतो, त्यालाही आमच्यासारख्या प्रापंचिक अडचणी असतात. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने आमच्यासारखी सामान्य जनताच तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यात धडाडीने पुढे असते. मग वर्दी अंगावर आल्यावरच तुम्ही सामान्य जनतेला विसरून धनिकांच्या म्हणण्यानुसार वागायला का सुरूवात करता ?
आज सामान्य जनता कायदा व पोलिसांच्या वर्दीचा मान राखते म्हणून पोलिसांचा प्रतिकार करत नाही म्हणून पोलिसांनी वर्दीच्या आडून सामान्यांचा छळ करणे कितपत योग्य आहे ?
आज धनाढ्य शाळा प्रशासन पोलिसांचा धाक दाखवून त्याआडून पालकांना गुलामाची वागणूक देत असेल तर त्यातील पन्नास टक्के पापाचे भागीदार हे पोलिस प्रशासन आहे.
एकूण परिस्थिती पाहता देशाची वाटचाल अधोगतीकडेच जाण्याची चिन्हे आहेत.
खरंच देशभक्तीने प्रेरित होऊन पोलिस खाते जाॅईन केले असेल तर तुम्हाला आमचा सलाम... पण ती देशभक्ती तुमच्या कृतीतून दाखवून द्या. पैसा आज आहे आणि उद्या नाही. पैसेवाले पैशाच्या जोरावर तुम्हाला वापरून घेतील व विसरूनही जातील. ज्यावेळी तुम्ही पैशावर विकले जाता त्यावेळी त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. परंतु, सामान्य जनतेचा तळतळाट संपूर्ण कमावलेल्या पैशाला क्षणात मातीमोल करू शकतो.
ज्यावेळी कोरोनाच्या काळात तुम्ही तुमची ड्युटी बजावत होतात, त्यावेळी हीच सामान्य जनता तुम्हाला सलाम करत होती.
ज्यावेळी गणेशोत्सव अथवा इतर सणांच्यावेळी तुम्ही रात्रंदिवस सेवा देता तेव्हा हीच सामान्य जनता तुमचा आदर करते आणि तुमचा ताण कमी करण्याहेतूने पोलिस मित्र व स्वयंसेवकांच्या रूपाने हिरीरीने सहभागी होते. आणि अशा अनेक प्रसंगी तुमच्या कार्याला सलाम करते.
परंतु, याच सामान्य जनतेला ज्यावेळी त्यांच्या न्यायिक हक्कांसाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळी मात्र तुम्ही त्यांना कायद्याचा धाकदपटशा दाखवता. व त्यांना त्यांच्या न्यायिक हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आणता. ही तुमची कृती मनाला अतिशय वेदना देऊन जाते.
Sunday, June 20, 2021
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अडचणींचा तो विशाल डोंगर अदम्य जिद्दीने करूनी पार, शिक्षित करूनी स्त्री जातीला केला अज्ञानावरी वार स्त्री शिक्...
-
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी को...
-
मानवप्रजाती पृथ्वीतलावरी असे अति बलशाली हो, तरीही त्याला हतबल करीतसे नैसर्गिक कार्यप्रणाली हो प्रगतीपथावर गेलो जरी तरी ठाव न लागे निसर्गाचा,...
-
एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्च...
-
नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही ...
कर्तृत्व
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...



%20Thoughtswing.com%20title%20images_48.jpg)
Thoughtswing.com_498.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_34.jpg)
Thoughtswing.com_500.jpg)













